हृदयविकारासारखाच मेंदूला होणारा आजार म्हणजे अर्धांगवायू. यालाच पॅरॅलिसिस, ब्रेन अॅटॅक किंवा वैद्यकीय परिभाषेत त्याला स्ट्रोक आणि सेरेब्रोव्हॅस्क्युलर अॅक्सिडेंट म्हणतात. अर्धांगवायूविषयी समाजामध्ये पुरेशी जागृती नाही. हा आजार रुग्णाचे विविध स्तरांवर नुकसान करतो. जीवाला तर धोका असतोच परंतु वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या विकलांगता मागे ठेवून जातो. जसे हातापायामधील लुळेपणा, तोतरेपणा, विस्मरण इ. यामुळे रुग्णाला काम करणे शक्य होत नाही, तो त्यासाठी अपात्र होतो. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवरच मर्यादा येते. काही रुग्णांना इतके अपंगत्व येते की दैनंदिन क्रिया जसे अंघोळ, कपडे घालणे, जेवणे यासाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यांचे जीवन परावलंबी होते. यामुळे रुग्ण डिप्रेशनमध्ये जातो. त्याचे जणू आयुष्यच उद्ध्वस्त होते.
अर्धांगवायू होण्याची कारणे- या कारणांना आपण धोक्याचे घटक म्हणू.
अर्धांगवायूचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
१) इस्चेमिक (ischemic) – ज्यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्त आणि चरबीची (कोलेस्टेरॉल) गुठळी अडकून मेंदूच्या विशिष्ट भागात रक्तप्रवाह बंद होणे.
२) हिमरेजिक (hemorrhagic)- मेंदूतील रक्तवाहिनी फुटून मेंदूत रक्तस्राव होणे.
दोन्ही प्रकारचे अर्धांगवायू होण्यामागचे धोक्याचे घटक हे काही आजार आहेत व काही सवयीदेखील कारणीभूत आहेत. वय वाढत जाते तसे आपल्याला पॅरॅलिसिस होण्याचा संभव वाढत जातो. कारण वय वाढत जाते तसे रक्तवाहिन्या मऊ राहत नाहीत. कडक होतात आणि त्यांमध्ये चरबी जमा होत जाते. ज्यामुळे गुठळी होण्याचा संभव वाढतो. ६० वर्षे वयानंतर पॅरॅलिसिस होण्याचा धोका वाढत जातो. स्त्रियांना ४५ वर्षे वयापर्यंत स्त्रियांचे हार्मोन इस्ट्रोजेन हे पॅरॅलिसिसपासून संरक्षण देते. त्यानंतर मात्र हे संरक्षण मिळत नाही.
या आजारामध्ये सर्वांत मोठा शत्रू आहे रक्तदाब. सतत जास्त दाबामुळे रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होऊ शकतो. तसेच रक्तवाहिन्यांची आतली त्वचा जाड होऊन गुठळी निर्माण होऊन रक्तपुरवठा बंद होऊ शकतो.
दुसरा शत्रू आहे मधुमेह. मधुमेहामुळे विविध प्रकारे रक्तप्रवाह कमजोर होतो व गुठळी होण्यासाठीचे पोषक वातावरण रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होते.
तिसरे कारण आहे, हायपरकोलेस्ट्रॉलेमिया. म्हणजे रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे. ही चरबी रक्तवाहिन्यांत जाऊन बसते. त्यामुळे गुठळी होण्याचा आणि पर्यायाने रक्तप्रवाह बंद पडण्याचा धोका वाढतो.
हृदयाचा कोणताही आजार पॅरॅलिसिस होण्यास कारणीभूत ठरू शकतो कारण हृदयाच्या आजारांमध्ये हृदयात गुठळी होते व ती सुटून मेंदूच्या रक्तवाहिनीत अडकू शकते.
लठ्ठपणा या आजारामुळेही रक्तवाहिन्यामध्ये चरबी व गुठळ्या बनून पॅरॅलिसिस होण्याचा धोका वाढतो. जीवनसत्त्व बी १२ च्या कमतरतेमुळे रक्तात असे काही घटक वाढतात जे गुठळी होण्यास पोषक वातावरण तयार करतात. कुठल्याही अपघातामुळे रक्तवाहिनीला झटका बसला तर रक्तवाहिनीच्या आतली त्वचा फाटून गुठळी बनू शकते. रक्तवाहिन्यांना सूज येणे म्हणजेच व्हॅस्क्युलायटिस या दुर्मीळ आजारामुळेही स्ट्रोक येऊ शकतो.
तंबाखू, सिगारेट, मद्य, गुटख्याच्या सेवनाची वाईट सवयही पॅरॅलिसिसला कारणीभूत ठरते. बैठी जीवनशैली, कामामध्ये कष्टाचा अभाव, व्यायाम न करणे ही सुद्धा अतिशय महत्त्वाची कारणे आहेत. हवा व पाण्यामधील प्रदूषणामुळेही रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे पॅरॅलिसिसला कारणीभूत असलेले मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा आदी आजार होऊ न देणे, जीवनशैली आरोग्यदायी ठेवणे, स्वच्छ वातावरणात राहणे अशी काळजी घेऊन आपण पॅरॅलिसिस टाळू शकतो.
त्या व्यतिरिक्त रुग्णाची विविध रूपाने काळजी घ्यावी लागते. स्ट्रोकच्या रुग्णांना सुरुवातीचे काही दिवस आयसीयू (अतिदक्षता विभाग) किंवा स्ट्रोक युनिटमध्ये (स्ट्रोक युनिट- स्ट्रोक रुग्णांची विशेष काळजी घेण्यास सक्षम असलेला दक्षता विभाग) भरती ठेवावे. रुग्णाची विशेष देखरेख करावी लागते. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण, हृदयाची स्पंदने, रक्तदाब, त्याची शुद्ध हरपली आहे का, मेंदूचे कार्यचालन व्यवस्थित चालले आहे का, अशा अनेक गोष्टींवर डोळ्यांत तेल घालून देखरेख करावी लागते. काही कमी-जास्त झाल्यास नवीन उपचार करावे लागतात. औषधे बदलावी लागतात. मास्कमधून प्राणवायूचा पुरवठा करावा लागतो, रक्तदाब व साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागते. रुग्णाची शुद्ध हरपत आहे किंवा श्वसनक्रिया कमजोर होत आहे, असे वाटल्यास त्याला कृत्रिम श्वसन द्यावे लागते.
याशिवाय रुग्णाचे पुनर्वसन करावे लागते. यात प्रामुख्याने फिजिओथेरपी व स्पीच थेरपी समाविष्ट आहे. रुग्ण बिछान्यावर पडून असेपर्यंत त्याला खास प्रकारची गादी (ज्याला हवा किंवा पाण्याने भरलेली) वापरावी लागते. त्याचबरोबर दर अर्ध्या, एक तासानंतर कुशी बदलावी लागते. यामुळे त्याला पाठीला व पार्श्वभागाला जखमा (बेडसोर्स) होत नाहीत.
आता पॅरालिसिस कसा टाळाल?
सर्वप्रथम डॉक्टरांनी रक्त पातळ होण्यासाठी, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, साखर कमी राहण्यासाठी औषधे सांगितलेली असतात, ती खंड न पडता नियमित घेणे. त्याबरोबर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'जीवनशैली बदलणे'. म्हणजे काय, तर तंबाखू, मद्यपान यांसारख्या वाईट सवयी सोडणे. त्याबरोबर रोज अर्धा तास तरी एरोबिक स्वरूपाचा व्यायाम करणे, उदा. चालणे, सायकलिंग, लठ्ठपणा व वजन कमी करणे, दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी १०-१५ मिनिटे ध्यानधारणा करणे.
सरतेशेवटी असे सांगावेसे वाटते, की पॅरालिसिसला वेळेत उपचार मिळाले, तर नुसता जीवावरचा धोकाच टाळता येतो, असे नाही, तर आलेली विकलांगतादेखील बरीच कमी करता येते. मात्र, उपचार वेळेत झाले पाहिजेत. 'टाइम इज ब्रेन'! त्याबरोबरच विविध प्रकारच्या औषधांच्या मदतीने व जीवनशैलीत बदल घडवून भविष्यात टाळतादेखील येतो.
डॉ. श्रीपाद पुजारी, कन्सल्टिंग न्यूरोफिजिशियन
No comments:
Post a Comment
Thanks you