Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

प्राणायाम

 प्राणायाम

For more information Click Here

  1. प्राणायाम
  2. प्राणायाम करण्याची पद्धती

प्राणायाम



इतर सर्व शरीर स्थिर ठेवून फक्त श्वसनाचा प्रमाणबध्द अभ्यास करणे, त्याबरोबरच मन स्थिर ठेवणे याला प्राणायाम असे नाव आहे. याचे अनेक प्रकार आहेत व ते योगविषयक पुस्तकात विस्ताराने दिलेले असतात. इथे फक्त त्यांतला एक प्रमुख प्रकार नमूद केला आहे. हा प्राणायाम पूरक-कुंभक-रेचक या नावाने ओळखला जातो.

प्राणायाम करण्याची पद्धती

यात वेळेचे प्रमाण अनुक्रमे 1:4:2 असे असते. म्हणजे पूरक (श्वास आत घेणे) 4सेकंदभर, तर कुंभक (आत ठेवणे)16 सेकंद व रेचक (श्वास सोडणे) 8 सेकंद याप्रमाणे नियम आहे. यासाठी कोठल्याही स्थिर आसनाची सवय झाली की पुरते. (मांडी घालूनही चालते, पद्मासन, सिध्दासन इ. आसनेही वापरली जातात). श्वास आत घेताना नाकाच्या मोकळया बाजूने सुरुवात करून दुस-या बाजूने सोडावे. पुढच्या श्वसनाचे वेळी नाकाच्या उलट बाजूने सुरुवात करावी. हा प्राणायाम करण्याआधी बंध शिकावे लागतात. सुरुवातीस दीर्घ श्वसन (संथश्वसन) शिकणे हे सर्वात सुरक्षित व सोपे असते. बसून, उताणे पडून किंवा उभ्या उभ्याही संथ श्वसन करता येईल. उताणे अवस्थेत 'पोटाने' संथ श्वसन केल्यास मन लवकर शांत होते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community मेडिसिन)

संदर्भ : आरोग्यविद्या


प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये संतुलित प्रमाणात प्रकर्षाने पाठवण्याची कला आहे.श्‍वासाद्वारे आत घेतलेला प्राणवायू फुफ्फुसाद्वारे रक्तामध्ये शोषून घेतला जातो आणि शरीरातील रक्ताभिसरण क्रियेद्वारे सर्व पेशींपर्यंत पाठवला जातो. पेशींच्या हालचालीसाठी ऊर्जाशक्ती प्राणवायूद्वारे प्राप्त होत असते. यातून निर्माण होणाराकार्बन डायऑक्साईड वायू उच्छ्वासावाटे बाहेर टाकला जातो. पेशींची चैतन्यपूर्ण हालचाल प्राणवायूमुळेच शक्य होत असते.प्रत्येक पेशीचे शरीरातील विविध इंद्रियांमध्ये विशिष्ट कार्य निसर्गाने नेमून दिलेले असते. ते चांगले व्हावे, पेशी कार्यक्षम,निरोगी, चैतन्यपूर्ण राहाव्यात, यासाठी योग्य प्रमाणामध्ये प्राणवायू पोहचवणे हे प्राणायामाद्वारे साध्य होत असते.इतर सर्व शरीर स्थिर ठेवून फक्त श्वसनाचा प्रमाणबध्द अभ्यास करणे, त्याबरोबरच मन स्थिर ठेवणे याला प्राणायाम असे नाव आहे.

इथे फक्त एक प्रमुख प्रकार नमूद केला आहे. हा प्राणायाम पूरक-कुंभक-रेचक या नावाने ओळखला जातो. यात वेळेचे प्रमाण अनुक्रमे 1:4:2 असे असते. म्हणजे पूरक (श्वास आत घेणे) 4सेकंदभर, तर कुंभक (आत ठेवणे)16 सेकंद व रेचक (श्वाससोडणे)8 सेकंद याप्रमाणे नियम आहे. यासाठी कोठल्याही स्थिर आसनाची सवय झाली की पुरते. (मांडी घालूनही चालते, पद्मासन, सिध्दासन इ. आसनेही वापरली जातात). श्वास आत घेताना नाकाच्या मोकळया बाजूने सुरुवात करून दुस-याबाजूने सोडावे. पुढच्या श्वसनाचे वेळी नाकाच्या उलट बाजूने सुरुवात करावी.हा प्राणायाम करण्याआधी बंध शिकावे लागतात. सुरुवातीस दीर्घ श्वसन (संथश्वसन) शिकणे हे सर्वात सुरक्षित व सोपे असते. बसून, उताणे पडून किंवा उभ्या उभ्याही संथ श्वसन करता येईल. उताणे अवस्थेत ‘पोटाने’ संथ श्वसन केल्यास मन लवकर शांत होते.

प्राणायाम व दिर्घश्वसन यांची माहिती



मन आणि शरीर व्यवस्थित राखण्यासाठी आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते ती म्हणजे ‘प्राणशक्ती’. प्राणशक्ती म्हणजे फक्त प्राणवायू नव्हे, तर या विश्वात सर्वत्र व्यापून राहिलेली जीवनीशक्ती . सजीवांच्या सर्व घडामोडी प्राणशक्तीवर चालतात. केवळ आपल्यालाच नव्हे तर पशू, पक्षी, झाडे, वनस्पती यांना देखिल प्राणशक्तीची आवश्यकता असते. प्राणशक्ती शिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. आपल्या अंतर्मनाचे मुख्य कार्य म्हणजे आपल्या शरीरांतर्गत अवयवांचे कार्य व्यवस्थित चालू ठेवणे. व यासाठी मेंदूला सुक्ष्म प्राणशक्तीची आवश्यकता असते. शरिरातील प्राणशक्ती जेव्हा कमी होते तेव्हा अंतर्मनाचे शरीर व्यवस्थित ठेवण्याचे कार्य बिघडते. प्राणशक्ती जर कमी झालेली असेल तर औषधांचा परिणाम देखिलशरीरावर जास्त होत नाही.वॄध्दत्व, आजारपण, सतत विचार करणे,बडबड करणे, चिंता , मानसिक व शारीरिक श्रम यामुळे शरीरातील प्राणशक्ती कमी होते. हि प्राणशक्ती प्राणायामाद्वारे किंवा दिर्घश्वसनाद्वारे आपण भरून काढू शकतो.

मुख्य म्हणजे प्राणायमामुळे मन आणि शरीर यांतील समतोल साधला जातो. जेव्हा माणसाचे मन अती चंचल किंवा भावनाप्रधान होते तेव्हा त्याच्या श्वासोच्छवास हा जलद आणि अनियमितपणे होत असतो. आणि मन जेव्हा शांत असते तेव्हाश्वासोच्छवास हा मंद आणि नियमितपणे होत असतो. यावरूनच श्वासाचा आणि मनाचा परस्पर संबंध दिसून येतो. प्राणायामाद्वारे प्राणशक्तीवर ताबा ठेवणे म्हणजे मेंदूतील प्रक्रियेवर ताबा ठेवणे होय. प्राणायाम हे अष्टांगयोगाचे चौथे अंग मानले जाते.

प्राणायाम म्हणजे योगाचा आत्मा.अष्टांगयोगात प्राणायमाचे अनेक प्रकार आहेत. ते सर्वांनाच जमतील असे नाही. पण त्यातलाच एक साधा-सोपा व सर्वांना करायला जमेल असा प्राणायमाचा प्रकार देत आहे. मात्र ज्यांना हृदयविकार, क्षयरोग, दमा किंवा फुप्फूसाचा विकार असेल त्यांनी प्राणायाम करू नये. त्याऐवजी दिर्घश्वसन करावे. प्राणायाम हा शक्यतो रिकाम्यापोटीच करावा.

प्राणायाम



जमिनीवर चटई किंवा सतरंजीवर साधी मांडी घालून, शरीर सैल सोडून बसावे. पाठ सरळ ठेवावी, ताठ ठेवू नये. दोन्ही हाताचे पंजे दोन्ही गुड्घ्यांवर ठेवावेत. ( किंवा हात असलेल्या खुर्चीत बसून प्राणायाम केला तरी चालतो.) प्रथमसंपूर्ण श्वास बाहेर सोडावा. नंतर मनात ४ अंक मोजून होईपर्यंत श्वास आत घ्यावा. घेतलेला श्वास १६ अंक मोजून होईपर्यंत छातीत तसाच कोडून ठेवावा. व ८ अंक मनात मोजत हळूहळू श्वास बाहेर सोडावा. हि क्रिया करीत असताना फुप्फूसावर,छातीवर अवास्तव ताण येता कामा नये.हा प्राणायाम कमीत कमी १० मिनिटे तरी करावा. या प्राणायामाने शरीरास जास्तीत जास्त प्राणशक्तीचा व प्राणवायूचा पुरवठा होतो.

दीर्घश्वसन

ज्याना प्राणायाम करायला जमत नाही, अशांनी दीर्घश्वसन करावे.दीर्घश्वसन म्हणजे सहज प्राणायामच. या क्रियेत श्वास आत कोंडून ठेवण्याची आवश्यकता नसते. तसेच दीर्घश्वसनासाठी विशिष्ट बैठकीची आवश्यकता नसते. चालताना,काम करीत असताना देखिल दिर्घश्वसन करता येते. दमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तीदेखिल हि क्रिया करु शकतात. कृतीः अगदी सावकाश आणि सहजपणे (फुप्फूसांवर/ छातीवर अतिशय ताण येणार नाही अशा बेतानेच) खोल श्वास घ्यावा व सावकाश बाहेर सोडावा. बस एवढेच .ही दीर्घश्वसनक्रिया कमीत कमी १५ मिनिटे तरी करावी.या दोन्ही क्रियेत, श्वास आत घेताना मनात अशी भावना ठेवावी,कि या विश्वात सर्वत्र व्यापून राहिलेली ‘प्राणशक्ती’ मी माझ्या संपूर्ण शरीरात भरून ठेवत आहे. आणि श्वास बाहेर सोडताना अशी भावना ठेवावी , कि माझ्या मनातील सर्व ताण-तणाव,दुःख, निराशा, भीती मी बाहेर टाकून देत आहे.

प्राणायाम किंवा दिर्घश्वसनक्रिया सुरू केल्यापासून १०-१५ दिवसांतच शरीरात नवचैतन्य निर्माण झालेले दिसून येते. चेहरा तेजस्वी होतो. मन प्रसन्न होते. उत्साह वाढतो. शरिरातील रक्ताचे प्रमाण वाढते. पोटाचे आरोग्य सुधारते,मज्जासंस्थेला बळ मिळते. तसेच लयबद्ध श्वासोच्छवासामुळे चंचल मन ताळ्यावर येते. शरीरास प्राणशक्ती भरपूर मिळण्यासाठी प्राणायमाचे प्रमाण हळूहळू वाढवत न्यावे. मात्र १ तासापेक्षा जास्त वेळ प्राणायाम करू नये. मनाची आणि शरीराची शक्ती वाढविण्यासाठी ॐ कार साधना, त्राटक व प्राणायाम यांचा अभ्यास नियमित करणे आवश्यक आहे.

ॐ कार साधना



अंतर्मनाच्या अगाध आणि प्रचंड सामर्थ्याचा जीवनात उपयोग करुन घेण्यापुर्वी अंतर्मनात दडून राहिलेले नकारात्मक विचार, भीती, दुःख व ताणतणाव काढून टाकणे जरूरीचे आहे आणि त्यावर प्रभावी उपाय म्हणजे ॐ कार साधना.
ॐ कार साधना – ॐ हा शब्द नसून एक शक्तीशाली ध्वनी आहे, हे पहिले लक्षात घ्या. मंत्रांना शक्ती प्राप्त होण्यासाठी मंत्रांच्या आरंभी ॐ लावला जातो. ॐ कार उच्चारणाचे अनेक फायदे आहेत. ॐ उच्चारताना जी कंपने (व्हायब्रेशन) निर्माणहोतात, त्या कंपनांचा आपल्या संपूर्ण शरीरावर अंतर्बाह्य अतिशय चांगला परिणाम होतो.शरिरातील पेशी, स्नायू, अस्थी व ग्रंथी यांची कार्यक्षमता वाढते. श्वसनक्रिया देखिल चांगलीच सुधारते. मात्र ॐ काराचा उच्चार विशिष्ट पध्दतीने केला तरचत्याचे फायदे दिसून येतात.
कृतीः जमिनीवर चटई किंवा सतरंजी अंथरून, त्यावर साधी मांडी घालून सरळ बसावे. दोन्ही हातांचे पंजे गुडघ्यांवर ठेवावेत. डोळे बंद करून घ्यावेत. संपूर्ण शरीर अगदी सैल सोडावे. ॐ कार उच्चारण्यास सुरूवात करावी. फुप्फुसावर ताण पडून देता खोल श्वास घ्या व ॐ म्हणा.ओ…म्.! ओम् म्हणताना ओ म्हटल्यावर साधारणपणे २-३ सेकंदानी म् काराचा उच्चार सुरू करावा. त्यावेळी आपले ओठ अलगद बंद करून घ्यावेत.व श्वास संपेपर्यंत म काराचा उच्चार करा. पुन्हा खोल श्वास घेऊन ॐकाराचा उच्चार करा.साधारणपणे १० मिनिटे हा अभ्यास करा. नंतर थोडावेळ त्याच अवस्थेत शांत बसून रहा. नंतर अलगद डोळे उघडून आसनातून उठा. ॐकाराचा उच्चार करीत असताना डोक्यापासून पायापर्यंत कंपने जाणवतील व एक वेग्ळ्याच प्रकारचा आनंद तुम्हाला मिळेल. हि क्रिया नियमितपणे, दररोज कमीत-कमी १० मिनिटे तरी करावी. नुसत्या ॐ काराच्या उच्चारणानेच कितीतरी मानसिक व शारीरिक विकार बरे झाल्याची उदाहरणे आहेत. हा सर्व त्यातील कंपनांचा (व्हायब्रेशनचा) परिणाम आहे. यासाठीच ॐ कार साधना जरूर करा.

प्राणायाम करत असताना मन सहज शांत अवस्थेकडे येते. मनातील विचार चक्रांचा वेग अगदी कमी होऊन जातो. श्‍वसनाचा वेगही खूपच कमी असतो. प्राणशक्तीद्वारा विश्‍वचैतन्यच शरीराच्या अणूरेणूतून संचरत असते. उत्साह वृद्धिंगत होत असतो आणि परमश्रेष्ठ असा आनंदमय अमृतानुभवाचा आस्वाद प्राप्त होतो.

स्त्रोत : महाराष्ट्र मराठी

प्राणायामचे प्रकार

  1. उज्जायी
    1. क्रिया
    2. फायदे
  2. सीत्कारी
    1. क्रिया
    2. फायदे
  3. शीतली
    1. क्रिया
    2. फायदे
  4. भस्त्रिका
    1. क्रिया
    2. फायदे
  5. भ्रामरी
    1. क्रिया
    2. फायदे
  6. मूच्र्छा
    1. क्रिया
    2. फायदे
  7. प्लाविनी
    1. क्रिया
    2. फायदे
  8. हे प्राणायाम करताना घ्यायची काळजी

उज्जायी



उद् + जय यापासून ‘उज्जायी’ हा शब्द तयार झाला. उद् म्हणजे ‘जोराने’ व ‘जय’ म्हणजे यश. ही क्रिया करताना कंठातून शिट्टीसारखा आवाज निघतो. या प्राणायामच्या सरावाने शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हा आपण हिवाळ्यात करावा.

क्रिया

मांडी घालून अथवा पद्मासनात बसावं. तोंड बंद ठेवा. आता हनुवटी गळपट्टीच्या हाडामध्ये व उरोस्थीवरील खोबणीत टेकू द्या. मानेला जास्त ताण देऊ नये. डोळे बंद करा आणि दोन्ही नाकातून हळुवारपणे दीर्घ श्वास घ्या. फुप्फुसे पूर्ण भरेपर्यंत श्वास घ्या. त्यावेळी ‘सस्’ असा आवाज होणे आवश्यक आहे. आता जीभ उलटी करून जिभेचा शेंडा तळ्याला आतल्या बाजूस लावून शक्य जितक्या वेळ रोखता येईल तेवढा वेळ रोखावे याला कुंभक म्हणतात. नंतर डोळे वर करा. व हळुवारपणे श्वास बाहेर सोडावे. यावेळी उजव्या हाताने उजवे नाक बंद करून डाव्या नाकाद्वारे छाती फुगवत श्वास बाहेर सोडावा. श्वास बाहेर जाताना घर्षणयुक्त आवाज येतो. हा आवाज एकसारखा असला पाहिजे.

फायदे



या प्राणायामामुळे डोक्यातील उष्णता कमी होते तसेच दमा, क्षय व फुप्फुसाचे रोग बरे होतात. या प्राणायामाच्या नित्य सरावाने जठराग्नी प्रदीप्त होते. त्यामुळे पचनक्रिया श्वसनक्रिया आणि ज्ञानक्रिया कार्यक्षम बनतात.

सीत्कारी



या प्राणायाममुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याचा सराव उन्हाळ्यात केला तर तो अधिक परिणामकारक होतो. तहान लागली असताना हा प्राणायाम केल्यास तहान भागल्याचं समाधान मिळतं.

क्रिया



प्रथम पद्मासनात किंवा मांडी घालून बसावं. आता दात एकमेकांवर दाबून ठेवा, जीभ दातांना लावा. जिभेचं टोक टाळ्याला लावा. ओठ किंचित विलग ठेवा आणि ‘सी.. सी..सी’ असा आवाज करून तोंडाने पूरक करा म्हणजेच श्वास आत घ्या. श्वास आत घेऊन झाल्यावर तोंड बंद करा व शक्य होईल तितका वेळ कुंभक करा व त्यानंतर दोन्ही नाकाने रेचक करा म्हणजे श्वास बाहेर सोडा.

फायदे



या प्राणायामच्या सरावाने भूक, तहान, आळस, झोप दूर पळतात. डोळे व कान यांना थंडावा येतो, यकृत, प्लीहा कार्यान्वित झाल्याने पचनक्रिया सुधारते. शारीरिक शक्ती व मनोबल वाढते. छातीत जळजळ होणे व पित्तासारखे दोष नष्ट होतात.

शीतली



या प्राणायाममुळे देखील शरीरात थंडावा निर्माण होतो. हा प्राणायाम वसंत आणि ग्रीष्म ष्टद्धr(7०)तूत केल्यास जास्त फायदा होतो. पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत या प्राणायामचा सराव करावा.

क्रिया



पद्मासन किंवा वज्रासन या आसनात बसून, तोंड उघडून जीभ बाहेर काढा आणि पक्षाच्या चोचीप्रमाणे जिभेची नळी करून ‘सी..सी..सी’ असा आवाज करीत तोंडाने जिभेवरून श्वास आत खेचा (पूरक करा). पूरक पूर्ण होताच तोंड बंद करा. थोडा श्वास रोखून ठेवा व दोन्ही नाकाद्वारे हळुवारपणे श्वास बाहेर सोडा. म्हणजेच रेचक करा.

फायदे



या प्राणायाममुळे रक्तात असणारे विषारी घटक बाहेर फेकले जातात, त्यामुळे रक्तशुद्धी होते. या प्राणायामच्या सरावाने प्लीहा, त्वचारोग, ताप, अजीर्ण होणे व बद्धकोष्ठता यांसारखे रोग बरे होतात. रागट व क्रोधी व्यक्तीसाठी हा प्राणायाम खूप लाभदायी आहे, कारण या प्राणायाममुळे डोके शांत राहते.

भस्त्रिका



या प्राणायामात लोहाराच्या भात्याप्रमाणे जोरात हवा आत घेतली जाते व बाहेर फेकली जाते म्हणून या प्राणायामास ‘भस्त्रिका’ असं म्हणतात. लोहार ज्याप्रमाणे त्याचा भाता जोरजोराने चालवतो त्याचप्रमाणे श्वास हा झपाटय़ाने घेतला जातो. कपालभाती व उज्जायी प्राणायामाचं मिश्रण यात दिसून येतं. कुंभकाच्या सर्व प्रकारांत भस्त्रिका अधिक लाभदायी आहे.

क्रिया



पद्मासनात अथवा मांडी घालून बसावं. पाठ, मान डोके ताठ ठेवावेत. हात गुडघ्यावर किंवा मांडीवर ठेवा. तोंड बंद ठेवा. लोहाराच्या भात्याप्रमाणे जलद व जोराने श्वास घ्या व तितक्याच जोराने श्वास सोडा. तसेच फुप्फुसाचे आकुंचन करा आणि नंतर फुलवा. हा प्राणायाम करताना मगरीच्या आवाजासारखा फस, फस.. फस.. असा आवाज येईल. श्वास घेताना झपाटय़ाने व जलद आत घ्यावा, व तसेच सोडावा म्हणजेच पूरक व रेचक याने भस्त्रिकाचे एक पूर्ण आवर्तन होईल.

हे आवर्तन पूर्ण होईल तेव्हा दीर्घ श्वास घ्यावा. जमेल तेवढय़ा वेळ श्वास रोखून ठेवावा. त्यानंतर संपूर्ण श्वास बाहेर सोडायचा. प्रत्येक आवर्तनानंतर थोडा वेळ आराम करावा व सामान्य श्वासोच्छ्वास करावा. यामुळे फुप्फुसांना थोडा आराम मिळतो. शक्यतो प्रथम एकच आवर्तन करावे.थंडीमध्ये हा प्राणायाम सकाळ-संध्याकाळ करावा. उन्हाळय़ात फक्त सकाळच्या थंड वेळीच हा प्राणायाम करावा.

फायदे



या प्राणायाममुळे गळय़ाची सूज कमी येते. कफ नाहीसा होतो. नाक व छातीत होणारा त्रास बरा होतो. तसेच दम व क्षय यासारखे आजार बरे होतात. या प्राणायामुळे कफ, पित्त व वायूने होणारा त्रास नाहीसा होतो.

शरीराला उष्णतेची आवश्यकता असल्यास हा प्राणायाम करावा. शरीरात त्वरित उष्णता निर्माण होते.

भ्रामरी



‘भ्रामरी’ हा शब्द ‘भ्रमर’ या शब्दावरून आला आहे. हा प्राणायाम ‘ॐकार’ने केला जातो. हा आवाज भुंग्याच्या आवाजासारखा असल्याने या प्राणायामास ‘भ्रामरी’ असं नाव पडलं.

क्रिया

पद्मासनात अथवा मांडी घालून बसावं. दोन्ही नाकातून जोराने श्वास आत खेचा आणि बाहेर काढा. घाम येईपर्यंत ही क्रिया करावी. शेवटी नाकाद्वारे शक्य तितका दीर्घ श्वास घ्या आणि जितका वेळ श्वास रोखता येईल तितका वेळ रोखून ठेवावा. नंतर दोन्ही नाकपुडयांद्वारे श्वास बाहेर सोडा. सुरुवातीला जसजसा तुम्ही जोराने श्वास घ्याल तशीच तुमच्या रक्ताभिसरणाची गती वाढते आणि शरीरात उष्णता वाढत जाते. परंतु शेवटी घाम सुटल्यावर शरीर थंड पडते. 

 फायदे

या प्राणायामामुळे मन व चित्त प्रसन्न राहते.

विशेष नोंद : अनुलोम प्राणायामचा सराव केल्याशिवाय या प्राणायामापासून फारसा फायदा होणार नाही.

मूच्र्छा



या प्राणायामात साधकाची स्थिती ही मूच्र्छेप्रमाणे होते. तो भानरहित होतो. म्हणून यास ‘मूच्र्छा’ असं म्हणतात.

क्रिया



मांडी घालून बसावं अथवा पद्मासनात बसावं. नाकाद्वारे पूरक करा. नंतर जालंधरबंध करून कुंभक करा (श्वास रोखून ठेवा) व मूच्र्छा येईपर्यंत कुंभक चालू ठेवा. नंतर दोन्ही नाकाद्वारे रेचक करा.

फायदे



या प्राणायाममुळे मन भानरहित होते. त्यामुळे हा प्राणायाम करण्यास आनंद प्राप्त होतो. हा प्राणायाम केल्याने मनातील संकल्प-विकल्प नाहीसे होतात. काही काळ तरी मन परमात्मस्वरूप बनून जाते.

प्लाविनी

प्लाविनी हा शब्द संस्कृतमधील ‘फ्लु’ (पोहणे) म्हणजेच पोहायला लावणारी. हा प्राणायाम करणाऱ्यास पाण्यावर पोहण्याची क्षमता प्राप्त होते. हा प्राणायाम करण्यासाठी कुशलतेची गरज असते.

क्रिया



सुरुवातीस वज्रासन या आसनात बसावं. अंतर दोन्ही नाकांद्वारे पूरक करून कुंभक करावं. नंतर जालंधरबंध करावं. यामुळे श्वास आतडयात साठवला जातो व त्यांना फुलवलं जातं. शेवटी दोन्ही नाकांद्वारे रेचक करा व गरज वाटल्यास ढेकर देऊन हवा बाहेर काढता येते.

फायदे


हा प्राणायाम करणारी व्यक्ती अनेक दिवसांपर्यंत अन्नाशिवाय म्हणजेच हवेवर राहू शकतो. या प्राणायाममुळे रक्ताभिसरणाची क्रिया अत्यंत वेगाने होते. त्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक नाहीसे होतात.

विशेष नोंद : हा प्राणायाम अत्यंत हळुवारपणे क्रमश: व नियमितपणे करावा. या प्राणायामचा अभ्यास ज्ञानी गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावा.

हे प्राणायाम करताना घ्यायची काळजी



  • प्रथम हे प्राणायाम ज्ञानी गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावा.
  • प्रथम श्वास कसा घ्यावा व कसा सोडावा याचा अभ्यास करावा.
  • हा प्राणायाम करताना प्रथम श्वासांची तयारी करावी. म्हणजेच एक नाक बंद करून दुस-या नाकाने श्वास घेणे व सोडणे, तसेच दुस-या नाकपुडीनेही करावे.
  • प्राणायाम करताना कंफर्टेबल आसनात बसून करावं.
  • प्राणायाम करताना घाई करू नये.
  • फक्त वाचून प्राणायाम करू नये. जाणत्या योग गुरूंच्या मदतीने किंवा त्याच्या साहाय्याने त्यांच्या समोर
    करावा.
  • थकवा येईपर्यंत प्राणायाम करू नये.
  • प्राणायाम करताना श्वासोच्छ्वास अत्यंत सावकाश करावा असे पतंजलीने सांगितले आहे. असे केल्याने मन स्थिर व शांत होते.
  • प्राणायामसाठी जागा हवेशीर व शांत असावी.
  • प्राणायाम केल्यानंतर लगेच स्नान करू नये. अध्र्या तासानंतर करावे.

स्त्रोत : प्रहार

For more information Click Here

1 comment:

Thanks you

Participate in All India Interuniversity SOFTBALL tournament 2024-25

 दिनांक ३० एप्रिल ते ४ मे २०२५ रोजी विश्वकर्मा सिम्हापूरी युनिव्हर्सिटी, नेल्लूर, आंध्रप्रदेश येथे होत असलेल्या अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धे...